बदलत्या परिस्थितीत पदवी बरोबरच विद्यार्थ्यांकडे कौशल्य असणे आवश्यक - प्रा. डॉ. भरत पाटील
कराड/ प्रतिनिधी :
जागतिकीकरणामुळे औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. परिणामी वाणि ज्य व व्यवस्थापन शाखेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत मात्र बदलत्या परिस्थितीत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पदवी बरोबरच सचोटीने व कौशल्यपूर्णतेने काम करण्याची क्षमता असली पाहिजे असे प्रतिपादन कन्या महाविद्यालय कडेगाव येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. भरत पाटील यांनी केले.
बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित 'वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी' या विषयावर ते प्रमुख साधनव्यक्ती म्हणून बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रा. जी.आर. वास्के हे प्रमुख उपस्थितीत होते.
याप्रसंगी प्रा. जी. आर. वास्के म्हणाले, कॉमर्स विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट या करिअर व्यतिरिक्त मार्केटिंग, फायनान्स, व्यवस्थापन, एच आर, अकाउंट्स, ऑडिट, बिझनेस टॅक्सेशन, कम्युनिकेशन, कॉस्टिंग या सर्व बाबींकडे प्राधान्याने पाहणे गरजेचे आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे बदलत्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी एक संधी म्हणून पहावे. शासन देखील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असे धोरण राबवत आहे.
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. सचिन बोलाईकर तर पाहुण्यांची ओळख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. तबस्सुम आत्तार व आभार डॉ. रणजीत लिधडे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. अशोक खोत, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. महेश लोहार, प्रा. कापसे आदींनी प्रयत्न केले.
फोटो कॅप्शन :
कॉमर्स शाखेतील करिअरच्या संधी या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. भरत पाटील, प्रा. जी.आर. वास्के सोबत प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. सचिन बोलाईकर आदी. मान्यवर





No comments:
Post a Comment
Thanks for reply