Tuesday, September 20, 2022

निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. - डॉ. महेश गायकवाड (ओझोन दिन १६-०९-२०२२)

निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. - डॉ. महेश गायकवाड 

कराड (प्रतिनिधी) : विकासाच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आज मनुष्य निसर्गात अतिरेकी हस्तक्षेप करत आहे. एका बाजूला मनुष्याचा विकास होत असला तरी दुसऱ्या बाजूला हळूहळू निसर्गाचे अध:पतन होत आहे, हे देखील तितकेच खरे आहे. तेव्हा प्रत्येक जनमाणसाने यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तरच पर्यावरणीय समतोल राखला जाईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी केले.

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे भूगोल विभागाच्या वतीने आयोजित ओझोन संरक्षण या विषयावरील भित्तीपत्रिकेचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भूगोल विभाग प्रमुख प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सचिन बोलाईकर आदी प्रमुख उपस्थित होते. 

डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, दैनंदिन दिनक्रमाच्या प्रत्येक टप्प्यात माणसाकडून विघातक वायूंचे उत्सर्जन होत आहे. त्याचा परिणाम ओझोन थरावर होत आहे. यामुळेच हिमनग वितळण्याची प्रक्रिया चालू आहे. दिवसेंदिवस समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे हे असेच होत राहिले तर भविष्यातील जीवसृष्टी धोक्यात येईल. तेव्हा पर्यावरणाप्रती अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

मनोगत व्यक्त करताना प्रा. शोभा लोहार म्हणाल्या, युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्लीने 19 डिसेंबर 1994 रोजी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. ओझोन थर सूर्यापासून निघणाऱ्या हानीकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. अल्फाज भालदार, इजाज सवार, विलास साळुंखे या विद्यार्थ्यांनी सदर भित्तिपत्रिकेसाठी संकलन व लेखन केले. कार्यक्रमास प्रा. ए. जी. खोत, प्रा. सुरेश काकडे, प्रा. डॉ. प्रवीण साळुंखे प्रा. महेश लोहार तसेच बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.














3 comments:

  1. खूप छान भित्तीपत्रिका.
    भूगोल विभागाचे हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  2. 💐 मनापासून अभिनंदन 💐

    ReplyDelete

Thanks for reply